मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणूक आखाड्यात एनडीए महायुती आणि इंडिया महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्ष उमेदवार घोषित करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याची तयारी करत आहेत. मात्र राज्यातील जनतेचा मूड काय आहे? त्यांना काय वाटतं? ते कुणाला बहुमत देतील? यासारख्या विविध प्रश्नावर एबीपी सी व्होटरने सर्व्हे केला आहे. त्यातील ओपिनियन पोलमधून समोर आलेले आकडे पाहून महायुतीसह मविआलाही टेन्शन येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील महायुतीत भाजपासह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, रामदास आठवलेंची आरपीआय, महादेव जानकरांचा रासप सहभागी आहे. तर इंडिया प्रणित महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना सहभागी आहे. मतांच्या टक्केवारीकडे पाहिले तर याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात काटे की टक्कर होताना दिसते. दोन्हीही युती, आघाडी समसमान ४१ टक्के मते घेण्याचा अंदाज आहे. त्यात १८ टक्के मते ही अन्य पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.
महिन्याच्या तुलनेत कोणाला किती मते?
महायुती आघाडी इतर
एप्रिल ४१ टक्के ४१ टक्के १८ टक्के
मार्च ४३ टक्के ४२ टक्के १५ टक्के
मार्च आणि एप्रिल महिन्याच्या आकडेवारीची तुलना केली तर, एनडीए महायुतीला २ टक्के मतांचा फटका बसतोय. एनडीएला मार्चमध्ये ४३ टक्के मतांचा अंदाज होता. हा आकडा एप्रिलमध्ये घसरून ४१ टक्क्यांवर आला आहे. तर इंडिया महाविकास आघाडीलाही १ टक्क्यांचे नुकसान होताना दिसते. मार्चमध्ये ४२ टक्के तर एप्रिलमध्ये ४१ टक्के मते महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज आहे. तर अन्य पक्षांच्या खात्यात ३ टक्के मतांचा फायदा होताना दिसतोय. मार्चमध्ये इतरांच्या खात्यात १५ टक्के मते होती जो आकडा आता एप्रिलमध्ये १८ टक्क्यांवर पोहचला आहे.