धाराशिव : प्रतिनिधी
भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे दि. ७ मे रोजी मतदानाच्या दिवशी एकाचा खून झाला होता. या खूनाच्या गुन्ह्यातील ४ पैकी ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पाटसांगवी येथील मयत समाधान नानासाहेब पाटील यांचा दि. ७ रोजी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास बसस्थानक पाटसागंवी येथे खून झाला होता. या प्रकरणी पाटसांगवी येथील आरोपी आप्पाराव भिमराव नाईकनवरे, राजकुमार भिमराव नाईकनवरे, दत्तात्रय भिमराव नाईकनवरे, गौरव आप्पाराव नाईकनवरे या चौघांच्या विरोधात भूम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. आरोपींनी भारत चंद्रशेखर पाटील याला बसस्थानक पाटसांगवी येथे का मारले, असे विचारण्यासाठी गेल्याच्या कारणावरुन आरोपी गौरव नाईकनवरे याने मयत समाधान पाटील यांच्या पोटात चाकु मारुन खून केला होता.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे ओदशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोहेकॉ अमोल निंबाळकर, विनोद जानराव, पोना नितीन जाधवर, पोना बबन जाधवर, अशोक ढागारे, रवींद्र आरसेवाड, चालक श्री. अरब, विजय घुगे, प्रशांत किवंडे असे दोन पथके रवाना झाले. या गुन्ह्यातील आरोपी हे कुर्डुवाडी येथे आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने त्या ठिकाणी जावून आरोपी गौरव आप्पा नाईकनवरे, आप्पा भिमराव नाईकनवरे, या दोघांना ताब्यात घेतले. तसेच राजकुमार भिमराव नाईकनवरे यांना बीड येथून ताब्यात घेतले. तीनही आरोपी यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता, त्यांनी समाधान पाटील यांच्या पोटात चाकू मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले व तेथून निघून गेलो अशी गुन्ह्याची कबुली दिली. या तीनही आरोपींना भूम पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि- अमोल मोरे, सचिन खटके, अमोल निंबाळकर, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढगारे, रविंद्र आरसेवाड, चालक अरब, विजय घुगे, किवंडे यांच्या पथकाने केली.