हैदराबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने बेरोजगारीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींना खोचक टोला लगावत देशातील तरूणाईला मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, देशातील युवा ही देशाची शक्ती आहे. नरेंद्र मोदी यांच्या हातून निवडणूक निसटत चालली आहे. ते पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत. म्हणून त्यांनी निर्णय घेतला असून काही ना काही करून ध्यान भटकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते काहीतरी नाटक करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. बेरोजगारी हा एक मोठा मुद्दा आहे. ते खोटे बोलत आहेत. भरती भरोसा स्कीमच्या माध्यमातून तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे.
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हीडीओ शेअर करत मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यांनी कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनत आहे आणि १५ ऑगस्टपर्यंत आम्ही देशातील ३० लाख रिक्त सरकारी पदांच्या भरती प्रक्रियेचे काम सुरू करणार आहोत ही आमची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, तुम्ही तुमच्या मुद्यांवर ठाम राहा. इंडिया की सुनो, नफÞरत नहीं, नौकरी चुनो। तेलंगणातील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अदानी-अंबानी या विषयावरून काँग्रेसवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधींनी बुधवारी भाजपसह मोदींवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, मोदीजी थोडे घाबरला आहात काय? तुम्ही बंद खोलीत अदानी-अंबानी यांच्याविषयी चर्चा करायचा. पण, आता प्रथमच जाहीर सभेत अदानी-अंबानी या विषयाला हात घातला. ते टेम्पोमध्ये पैसे देतात हे देखील तुम्हाला माहिती आहे.
हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा सीबीआय आणि ईडीला त्यांच्याकडे पाठवा… सगळी माहिती घ्या. मी पुन्हा एकदा देशाला सांगतो की, जेवढा पैसा मोदींनी अदानी-अंबानी यांना दिला आहे, तितकेच पैसे आम्ही हिंदुस्तानातील गरिबांना देऊ. त्यांनी २२ अरबपती बनवले… महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना, या योजनांच्या माध्यमातून आम्ही कोट्यवधींना लखपती बनवू असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.