मुंबई : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणा-या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून संपूर्ण सवलत देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या वाहनांना, एसटी बसेसकडून टोल आकारला जाणार नाही.
वाहनांच्या टोलमाफीसाठी गणेशोत्सव २०२५ कोकण दर्शन या नावाचे विशेष पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्रा धरले जाणार आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार ग्रामीण आणि शहरी पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच यासंदर्भात जाहीरात आणि सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.