शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भागातील तुंबलेल्या गटारीची तात्काळ स्वच्छता व सांडपाण्याच्या निच-याची व्यवस्था करण्यात यावी व नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या विषयी तात्काळ कार्यवाही करावी, याबाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे नागरिकांनी मागणी केली आहे. शिरूर अनंतपाळ शहरातील मुख्य बाजारपेठ, अंगणवाडी, नगरपंचायतीचे व्यापारी संकुल तसेच श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील गटार पूर्णपणे तुंबलेली असून परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, प्लास्टिक कचरा व सांडपाणी साचलेले आहे. सदर गटारीचे पाणी पुढे जाण्यास कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. लहान मुले, महिला , व्यापारी व जेष्ठ नागरिकांना या अस्वच्छतेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे . तसेच डासांचे प्रमाणही वाढून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असल्याने तुंबलेली गटार तातडीने स्वच्छ करण्यात यावीत, साचलेला कचरा व प्लास्टिक हटविण्यात यावा, सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, परिसरात नियमित स्वच्छता व फवारणी करण्यात यावी व संबंधित अधिका-यांकडून पाहणी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी अस्वच्छ व धोकादायक परिस्थिती निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे . नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संदिप धुमाळे, किराणा मालाचे व्यापारी बालाजी यरमलवार, जयलिंग कोरे, तानाजी सुरवसे, राहूल तांबोळकर, सोमनाथ खंडापुरे, तुषार मादळे, विरप्पा खंडापुरे, प्रशांत यरमलवार, अजय मंठाळे इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
















