नवी दिल्ली : दिल्लीतील ओल्ड राजिंदर नगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. अशी माहिती पेलस अधिका-यांनी आज दिली. मध्य दिल्लीचे डीसीपी एम हर्ष वर्धन यांनी सांगितले की कोचिंग सेंटरमधील पुराच्या घटनेप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. या घटनेला जबाबदार असणा-यांवर आम्ही कडक कारवाई येत आहे. असे ते म्हणाले.
त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इमारतीच्या तळघराच्या मालकाचाही समावेश असून, एका थार चालवणा-या ड्रायव्हरचा समावेश आहे. पोलिसांच्या मते, या थार चालकाने आपली थार गाडी कोचिंग सेंटर वाहेरून भरधाव वेगात चालवल्याने कोचिंग सेंटरचे गेट तुटले आणि त्यामुळे पाणी आतमध्ये शिरले असे सांगण्यात येत आहे. शनिवारी मुसळधार पावसानंतर ही घटना घडल्यानंतर इमारतीचे मालक अभिषेक गुप्ता आणि कोचिंग सेंटरचा समन्वयक देशपाल सिंग या दोघांना रविवारी अटक करण्यात आली होती. दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधासह इतर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एमसीडीनी १३ इमारती केल्या सील
दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) रविवारी उमेदवारांच्या विरोधानंतर करोलबागमधील १३ कोचिंग सेंटर्सच्या तळघरांना इमारत उपनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सील केले. दरम्यान, आज देखील या दुर्घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते. आंदोलक विद्यार्थी कोचिंग सेंटर्स आणि बेसमेंटमध्ये लायब्ररी चालवणा-या मालकांवर कारवाई, अवास्तव भाडे आणि ब्रोकरेज नियंत्रित करण्यासाठी भाडे नियमन कायदा आणि विद्यार्थ्यांसाठी विमा संरक्षण किंवा तक्रार निवारण यंत्रणा अशी मागणी करत आहेत.