साडेसात कोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम
डेहराडून : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवर जोरदार हल्लाबोल केला. गांधी यांनी आकडेवारी जाहीर करत केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर हल्लाबोल केला. गेल्या १० वर्षांत १५२ पेपर लीक झाले. याचा थेट आणि विपरित परिणाम साडेसात कोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झाला, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लज्जास्पद बाब म्हणजे या प्रकरणांत एकाही व्यक्तीला शिक्षा झाली नाही. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, देशातील परीक्षा यंत्रणा खिळखिळी झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी पेपरफुटीला महारोग असे म्हटले आहे. टीव्ही आणि वृत्तपत्रात येणारी पेपरफुटीची प्रकरणे हिमनगाचे टोक आहे. हा धंदा खूप खोलवर रुजलेला असून काळा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. देशातील विविध राज्यांच्या भरती परीक्षा आणि देशातील नीटसारख्या मोठ्या परीक्षांची खुलेआम विक्री होत आहे, त्याचे रेटकार्ड निश्चित करण्यात आले आहे. टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या अॅपचा वापर करून हा काळा धंदा सुरु आहे. या इकोसिस्टीमध्ये कोचिंग सेंटर, पेपर सेट करणारे लोक आणि काही मोठे अधिकारी यात सहभागी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
सरकारच्या संवेदनहिनतेवरही राहुल गांधी यांनी टीका केली. मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, उद्योजकता आणि खासगी क्षेत्रातील नोक-या कमी होत आहेत. या स्थितीत युवकांकडे चांगले आयुष्य जगण्यासाठी सरकारी नोकरी ही शेवटची आशा राहते. मात्र, या मार्गावर काटे पसरले आहेत. एक कुटुंब त्यांच्या मुलाच्या ५ वर्षांच्या तयारीसाठी जवळपास ९ लाख रुपयांचा खर्च करते. देशातील जवळपास ९ कोटी तरुण सरकारी नोकरीच्या रांगेत आहेत. मात्र, नोक-या ६ लाख आहेत. म्हणजेच १५० उमेदवारांपैकी एकाच उमेदवाराला नोकरी मिळेल, तिथेदेखील पेपरफुटीचा डाग लागतो, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी डेहराडूनच्या सभेत देशातील सरकारला केंद्रित व्यवस्थेऐवजी विद्यार्थीकेंद्री व्यवस्थेकडे जावे लागेल, असे म्हटले. आधुनिक टेस्टिंग मॉडेल सॅट, जीमॅट सारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करणे आवश्यक असल्याचे म्हटले. नव्या व्यवस्थेमुळे एकाच वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांचे सेट मिळतील. नफा मिळवणा-या खासगी कंपन्यांना आऊटसोर्स करुन सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
हा तर कुटुंबाच्या
मेहनतीचा अपमान
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात रिया कुमारी या २३ वर्षीय विद्यार्थिनीच्या नावाचा उल्लेख केला. जिने नीट पेपरफुटीच्या बातमीने डिप्रेशनमध्ये जात जीवन संपवले. रियाचे वडील रमेश बाल राहुल गांधींसोबत मंचावर उपस्थित होते. पेपरफुटी हा सरकारी बेजबाबदारपणा नसून एका कुटुंबाच्या वर्षांच्या मेहनतीचा अपमान आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
















