लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका व रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिड-टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या हेतुने शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी येथील विलासराव देशमुख पार्क (नाना-नानी पार्क) येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. यात ३२० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. पर्यावरण संवर्धन,जलप्रदूषण प्रतिबंध व उत्सवामध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर वाढविणे हा कार्यशाळेचा उद्देश होता.यावेळी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेस महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, आयुक्त राहुल कुलकर्णी, गटनेते विजयकुमार साबदे, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, उद्यान व अतिक्रमण विभागप्रमुख समाधान सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी श्वेता नागणे, कार्यकारी अभियंता गणेश देवणीकर ,पंडित लोहारे, शहर समन्वयक रोहित पांचाळ यांची उपस्थिती होती. उपायुक्त वसुधा फड, पर्यावरण संवर्धन अधिकारी सन्मती मेस्त्री यांनी कार्यशाळेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत प्रोत्साहित केले.
यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ मिडटाऊनचे माजी प्रांतपाल सुधीर लातूरे, लातूरचे सचिव उमेश पत्रावळे, तनिक्षा बोरा रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन अध्यक्ष, प्रोजेक्ट चेअरपर्सन वेदांत मंदाडे व आदित्य लातुरे, मंजुषा कुर्डूकर, संगीता लातुरे उपस्थित होत्या. गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण कमी करणे,नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना जनमानसात रुजविणे यासाठी लातूर मनपाकडून जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींमधून ‘माझा गणपती-पर्यावरणपूरक गणपती’, हा संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार केल्याने संपूर्ण कार्यशाळेत उत्साहाचे वातावरण लाभले. या संयुक्त उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करावा आणि पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे म्हणाल्या की,गणेशोत्सव साजरा करताना आपण पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारावा.नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या मूर्तींचा वापर करण्यास आपण प्रोत्साहन देऊ.जलस्रोतांना प्रदूषित करणा-या घातक पदार्थांचा वापर टाळू.आपल्या परंपरांचा सन्मान राखतानाच पर्यावरणाचेही संरक्षण करणारा उत्सव श्री गणेशाला प्रिय आहे,असेही त्या म्हणाल्या. आयुक्त राहुल कुलकर्णी म्हणाले की, या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.आज पर्यावरणाचे संरक्षण ही समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेली मूर्ती घरीच विसर्जन करून त्या मातीचा उपयोग झाडे लावण्यासाठी करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
















