ओडिशा : वृत्तसंस्था
ओडिशात पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र प्रचंड जनसमुदायामुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढण्यात गोंधळ निर्माण झाला. रथयात्रेच्या मार्गावरील एका वळणावर रथ ओढण्यात खूप अडचण आली. रथ ओढणे थांबल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक एकाच ठिकाणी जमा झाले. यामुळे रथाच्या सुरळीत हालचालीत मोठा अडथळा निर्माण झाला. गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याने अनेक आव्हाने निर्माण झाली.
या गोंधळामुळे मोठ्या संख्येने भाविक अस्वस्थ झाले, ज्यामुळे काही लोक चेंगरून बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर पुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत ओडिशाचे मंत्री मुकेश महालिंग यांनी सांगितले की, ‘‘दमट हवेमुळे अनेकांना गुदमरल्यासारखे झाले, त्यामुळं ते बेशुद्ध झाले. मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंदिराच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लोकांना पुरेशा प्रमाणात ग्लुकोज आणि पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली जात आहे. पुरेशी वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी मी स्वत: आलो आहे. रुग्णालयात जाऊनही भेट देणार आहे, अशी माहिती मुकेश महालिंग यांनी दिली आहे.