लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे २०२५-२६ या वर्षाचे सुधारित व सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक २४ लक्ष रुपये शिल्लक दाखविणारे अंदाजपत्रक गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी स्थायी समितीद्वारे संमत केलेले अंदाजपत्रक हे सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले. यावर सर्व सदस्यांच्या सूचनांचा समावेश करून या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.
२०२६-२७ या वित्तीय वर्षाच्या प्रारंभी १२२ कोटी ६० लाख रुपये शिल्लक अपेक्षित आहे. या वर्षात २६३ कोटी २४ लक्ष रुपयांचे महसूली उत्पन्न, ४९ कोटी २ लक्ष असाधारण जमा, कर्ज व निधीच्या माध्यमातून ६७ कोटी १५ लक्ष रुपये, विविध शासकीय कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ४१ कोटी ९ लक्ष रुपये, भांडवली जमामधून १३५ कोटी ८६ लाख रुपये, केंद्र शासनाच्या अनुदानातून ३४८ कोटी ५३ लाख रुपये असे एकूण १०२७ कोटी ४३ लक्ष रुपयांचे
उत्पन्न महानगरपालिकेला अपेक्षित आहे.
या वर्षात महसुली खर्चासाठी २८४ कोटी २८ लाख रुपये, असाधारण खर्चासाठी ७० कोटी ४३ लाख रुपये, कर्ज व निधीच्या माध्यमातून ६७ कोटी १५ लाख रुपये आणि विविध शासकीय कल्याणकारी योजनासाठी ६१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या वर्षात १८७ कोटी ५७ लक्ष रुपयांचा भांडवली खर्च तसेच केंद्र शासनाच्या अनुदानातून ३५६ कोटी ८२ लाख असा एकूण १०२७ कोटी २५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.उत्पन्नातून खर्च वजा जाता २४ लक्ष रुपये शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले यांनी महापौरांकडे अर्थसंकल्प सादर केला. सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा झाली. यावेळी सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. या अर्थसंकल्पात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, प्रधानमंत्री आवास योजना यासाठीही विशेष निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
मालमत्ता विभागाकडून महसुली उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मनपाच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना ऑनलाइन सुविधा देण्याचे नियोजन आहे.मनपाच्या शाळांची दर्जा वाढ तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, अद्ययावत सभागृहाचे बांधकाम आदींसाठी या वर्षात निधी दिला जाणार आहे. अग्निशमन सेवांचा विस्तार व आधुनिकीकरण तसेच केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अंतर्गत विविध योजना, भुयारी गटार,महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणी,रस्त्यांची दुरुस्ती आदींवर या वर्षात मनपा कडून खर्च केला जाणार असून शहरातील नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्राधान्याने कामे केली जाणार आहेत.
















