देशाच्या अनेक भागात सध्या उष्णतेची भयानक लाट पसरली असून ही स्थिती २८ मे पर्यंत कायम राहील असा अंदाज आहे. नऊ दिवसांच्या या अत्यंत उष्ण काळाला ‘नौतपा’ असे संबोधले जात आहे. जैसलमेरमध्ये तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम राजस्थानमध्ये ‘तीव्र उष्णतेची लाट’ आणि पूर्व राजस्थानमध्ये ३० मे पर्यंत ‘उष्णतेची लाट’ राहील असा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ७ दिवस मध्य आणि वायव्य भारतात तर पुढील ३ ते ५ दिवस पूर्व आणि द्वीपकल्पीय भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. २९ मे नंतर तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊन कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमान ४८-५० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. देशातील अनेक राज्ये ४० अंशापेक्षा जास्त तापमानाचा सामना करत आहेत.
पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदिगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या भागात उष्णतेची लाट आली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर, खजुराहो, नौगाव भागात तापमानाने ४७ ते ४८ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला असून तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भीषण उष्णतेमुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील सरकारी कार्यालये आणि सर्व शाळांच्या वेळा बदलल्या आहेत. या संस्था सकाळी ७.३० ते १.३० या वेळेत सुरू राहतील. ब-याच ठिकाणी उष्णतेचा कहर सुरू असताना, झारखंडची राजधानी रांचीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक पूर्णपणे महानगरपालिकेच्या टँकरवर अवलंबून आहेत. हे टँकर सर्व भागात पोहोचत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासांत आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून शहराप्रमाणे ग्रामीण भागाला देखील या उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे खोळंबली आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसू लागला आहे.
उष्णतेच्या त्रासामुळे शेतमजूरही शेतीतील कामे थांबवून विश्रांती घेण्यास प्राधान्य देत आहेत. या तीव्र उन्हाचा ऊस पिकासह अन्य पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहे. पिकांसोबतच जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. सध्याच्या कडक उन्हामुळे नागरिकांमध्ये अशक्तपणा येणे, चिडचिड होणे असे त्रास जाणवत असून उष्माघाताची लक्षणेही दिसून येत आहेत. नागरिकांनी व विशेषत: बालकांनी दुपारी शक्यतो बाहेर पडणे टाळावे आणि सायंकाळीच बाहेर पडावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत उष्णतेची ही लाट अशीच कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तीव्र उष्णता जीवघेणी ठरत आहे. या तीव्र उष्णतेच्या वातावरणात हवामान विभागाने काहीसा दिलासा देणारी बातमीही दिली आहे. नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकला असून तो अंदमान समुद्र नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागामध्ये पोहोचला आहे.
साधारणपणे मान्सून १ जून रोजी दाखल होतो, परंतु यावेळी तो नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे २६ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्यामुळे निर्जलीकरण आणि उष्माघाताने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्वांत चिंताजनक आकडेवारी विदर्भातून येत आहे. ब्रह्मपुरीमध्ये ४७.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान देशातील सर्वाधिक आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील अनेक भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. विदर्भात सूर्याचा तीव्र प्रकोप कायम आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट तर चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट तर ठाणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला कोणताही विशेष अलर्ट नाही. जगातील ५० उष्ण शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व शहरे भारतातीलच आहेत.
अनेक ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. हा केवळ हवामानातील एक चढ-उतार नाही तर बदलणारे पर्यावरण आणि अनियोजित विकासाचा एक गंभीर इशारा आहे. आपली शहरे वाळवंटापेक्षा अधिक तापली आहेत. तापमानातील वाढ आश्चर्यकारक नाही. मात्र, ज्या गतीने ती वाढत आहे आणि त्याचा जो परिणाम होत आहे तो चिंताजनक आहे. एल निनोमुळे दुष्काळ घोंघावतो आहे. आपल्याकडे मुबलक अन्नसाठा असला तरी देशाचा औद्योगिक विकास आणि उत्पादन ठप्प होऊ शकते. चिंताजनक बाब म्हणजे केवळ दिवसाही नव्हे तर रात्रीही अधिक उष्णता जाणवत आहे. ३५ शहरांमध्ये रात्रीचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे हे पृथ्वीचा नैसर्गिक समतोल बिघडत असल्याचे लक्षण आहे. तीव्र उष्णतेचे सर्वांत मोठे कारण म्हणजे सतत कमी होणारे वनक्षेत्र, वाट्टेल तशी फुगणारी अवाढव्य शहरे, पाण्याच्या स्रोतावरील अतिक्रमण आणि प्रदूषण यातून वातावरण बदलाचा धोका निर्माण झाला आहे. विकासाच्या आंधळ्या ध्यासापायी आपण निसर्गाशी असलेले संतुलन गमावले आहे. शहरांमध्ये झाडांच्या जागा काँक्रीटच्या जंगलांनी घेतल्या आहेत. परिणामी पृथ्वीचा पृष्ठभाग अधिक उष्णता शोषून घेत आहे आणि त्यामुळे तापमान सतत वाढत आहे. भूजल पातळी वर्षागणिक खाली घसरत आहे. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणा-या गोष्टींवर भर दिला पाहिजे.
















