मुंबई : प्रतिनिधी
जुलैच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन जुलै महिन्यातील सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला. मात्र, राज्यातील अनेक भाग अजूनही कोरडे आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात हंगामातील चांगला पाऊस नोंदला जाणे अपेक्षित असते. मात्र, सध्या महाराष्ट्रासह मध्य भारतातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली असून पुन्हा राज्यवासीयांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस तरी राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता नाही, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.
राज्यात यंदा हवामान बदलाचे परिणाम तीव्र होताना दिसत आहेत. त्यातच यंदा मान्सूनच्या संपूर्ण हंगामावर प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा खडतर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यंदा उन्हाळ्यात राज्यात दीर्घ काळ तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागला. यादरम्यान उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची अनेकदा नोंद झाली. जून महिन्यात मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यानंतरही उष्णता कायम होती.
मागील काही दिवसात कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग वगळता उर्वरित राज्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे अनेक भाग दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात काहीशी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमीच आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या मान्सूनला बळ देणा-या हवामान प्रणालींचा अभाव असल्याने काही भागात हलक्या सरींची नोंद वगळता पावसाची नोंद होत नसून पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील बहुतांश भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच बुधवार ते शनिवार यादरम्यान विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरींची नोंद होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, निम्मा महाराष्ट्र अजूनही कोरडाच असून काही प्रदेशात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
















