परभणी : जिल्ह्यातील खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. तलवारबाजी स्पर्धांमधून ग्रामीण व जिल्हास्तरावरील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळत आहे. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले.
परभणी जिल्हा तलवारबाजी क्रीडा संघटना व वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ७वी चाइल्ड व १८वी मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ही स्पर्धा दि. २१, २२ व २३ ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. प्रकाश काटोळे हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. राहुल पाटील, परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटना अध्यक्ष रवी पतंगे, प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, घाटनांदूर वसुंधरा महाविद्यालय प्राचार्य प्रा. डॉ. अर्जुन मोरे, शेषनारायण लोढे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ यांनी केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत ६००हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविल्याचे सांगितले. ही स्पर्धा प्रामुख्याने १० व १२ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंसाठी असल्याने लहान वयातच खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेचा अनुभव मिळत आहे. या खेळाडूंमधून भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करणारे उत्कृष्ट तलवारबाज निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध गटांतील विजेत्या व गुणवंत खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक, ट्रॉफी व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुशील देशमुख यांनी तर गोविंद शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले. यशस्वीतेसाठी अजय देशमुख, अनिल देशमुख, अनिल राऊळे, विनीत रणमाळ, सुशील जोरगेकर, संतोष तुरे, संजय भुमकर, पिराजी कुसळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
















