बंगळुरूने १७ वर्षांचा दुष्काळ संपविला, विराटच्या डोळ््यात आनंदाश्रू
अहमदाबाद : वृत्तसंस्था
आरसीबीने अखेर १८ व्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आणि विराट कोहलीचे स्वप्न साकार झाले. आरसीबीने पंजाब किंग्सवर आयपीएलच्या फायनमलध्ये ६ धावांनी विजय साकारला आणि त्यांनी प्रथम विजेतेपदाला गवसणी घातली. यावेळी विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. दुसरीकडे पंजाब किंग्जनेही आक्रमक फलंदाजी केली. एकानंतर एक फलंदाज परतत असताना शशांक सिंगने चांगलीच झुंज दिली. परंतु थोडक्यात पंजाब किंग्जला सामना गमवावा लागला.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर त्यांचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत राहिले. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आरसीबीने अचूक आणि भेदक मारा करत सामन्यावर वरचष्मा निर्माण केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आरसीबीविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना रंगला.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्धारित २० षटकांत बंगळुरूने ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात पंजाबच्या काईल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी ३ बळी घेत आरसीबीचे कंबरडे मोडले होते. यात बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या, तर त्याला कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चौघांनी चांगली साथ दिली. त्यामुळे आरसीबीला १९० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत आरसीबीला २०० च्या आत रोखले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. परंतु ठराविक अंतराने विकेट गमावल्याने पंजाबच्या संघ बॅकफूटवर आला तरीही शशांक सिंग अखेरपर्यंत झुंजला. परंतु त्याला पंजाबला विजय मिळवून देता आला नाही.