मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातील पदाधिकारी सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोमवारी (१३ जुलै) सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांची पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचे नोटीस पाठवल्याचे सांगण्यात आले आहे. सच्चिदानंद सिंह हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून ते माजी सचिव आहेत. त्यामुळे त्यांनी थेट वकिलांमार्फत ही नोटीस पाठवल्याने याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यानंतर आता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नोटीसबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांना आलेल्या नोटिसीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या नोटिसीबाबत स्पष्टपणे म्हटले आहे की, सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही, त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कुठलेही कारण नाही, सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून झालेली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सुधारणा पक्षांमध्ये आवश्यक आहेत, ही नोटीस येण्याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये माझे मत मी मांडले. या माझ्या मताचा आणि नोटीसचा कुठलाही संबंध नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी पक्षांतर्गत काही सुधारणा करणे गरजेचे आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
२०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत राहिले होते. तसेच पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळावे यासाठी पडद्याआडून हालचाली करणा-या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. ते पक्षाचे माजी सचिव राहिले आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी पक्षाच्या दिल्लीतील आणि इतर राज्यांमधील राजकारणात ते भूमिका बजावत असतात. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सिंह यांचा समावेश नाही.
















