मुंबई : प्रतिनिधी
गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विमानात एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते. या सर्व लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच
या विमान अपघातात एका निवासी डॉक्टरांच्या इमारतीचे देखील नुकसान झाले असून यामध्ये २० निवासी डॉक्टर दगावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानात महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशनी सोंघरे हे महाराष्ट्रातीलही प्रवासी होते, ज्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. राज्यभरातून राजकीय नेते, सिनेसृष्टीतून घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
दरम्यान, सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, उड्डाण घेतल्यानंतर, विमान शहरातील निवासी भागातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर त्यात मोठी आग लागली. अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचे देखील कळतंय, हे अतिशय दु:खद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणा-या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणा-या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना पवार यांनी केली आहे.
विमान अपघात अतिशय धक्कादायक : शिंदे
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघात अतिशय धक्कादायक आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. गुजरात प्रशासन मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य करत असून विमानातील वाचलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. या भयंकर दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला : आदित्य ठाकरे
अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला, दु:ख झाले. या दुर्घटनेत वाचलेल्यांच्या आणि त्या विमानातील सर्वांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे म्हणत आपण सर्वांसाठी आशा आणि प्रार्थना करूया असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.