मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी थांबल्याने लोकल रेल्वे सेवा कोलमडली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. त्यातच पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा केवळ वसई स्थानकापर्यंत सुरू असल्याने नालासोपारा आणि विरारकडे जाणारे हजारो चाकरमानी वसई स्थानकात अडकून पडले. या प्रवाशांना वसईतच रात्र काढावी लागली.
वसई-विरार महापालिकेने संकटाच्या काळात वेळेत बचावकार्य केल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. बचाव पथकाने पूरग्रस्त भागात धाव घेत अडकलेल्या १५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन आणखी ५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारकरांच्या अडचणी वाढल्या. पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा वसई स्थानकापर्यंत सुरू असल्याने नालासोपारा आणि विरारकडे जाणारे हजारो चाकरमानी वसई स्थानकात अडकून पडले आहेत. वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवाही बंद आहे. तसेच पावसामुळे रिक्षा सेवा, एसटी सेवा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांसमोर घरी पोहोचण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.
६ जिल्ह्यांत शाळा बंद
मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी अधिकृत सुटी जाहीर केली. तसेच सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई व सातारा या ५ तालुक्यांतील अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांनाही सुटी जाहीर केली.
















