पुणे : प्रतिनिधी
दमदार पावसाच्या प्रतीक्षेत राज्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या केवळ ८ टक्के अर्थात सुमारे ११ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पुणे विभागात फक्त ३२,३६४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी मान्सूनने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे या तारखेपर्यंत गेल्या वर्षी ७६ लाख हेक्टर अर्थात सुमारे ५२ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या.
जून महिना संपला तरी राज्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. यंदा अवकाळी पावसाची हजेरीही तुरळकच राहिल्याने धूळ अर्थात मान्सूनपूर्व पेरणीचे प्रमाणही कमीच राहिले आहे. हमखास पावसाचे असलेले मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतक-यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १ कोटी ४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर इतके आहे. तर यंदा २९ जूनपर्यंत राज्यात १० लाख ९४ हजार ८०८ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ३ लाख २३ हजार ९६० हेक्टर क्षेत्र अमरावती विभागातील आहे. तर सर्वात कमी ५ हजार ७५८ हेक्टरवरील पेरण्या कोकण विभागात झाल्या आहेत. जिल्हानिहाय पेरणीचा विचार करता यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३८ हजार १७६ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर सोयाबीनची १ लाख १९ हजार तर कापसाची लागवड ७ लाख २६ हजार हेक्टरवर झाली आहे.
खरीप हंगामाची पूर्वतयारी पूर्ण
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बळीराजाच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून शेतक-यांनी शेतजमिनीची मशागत, नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती यांसह पेरणीपूर्व सर्व कामे पूर्ण केली आहेत. काही शेतक-यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, आदी पिकांसाठी बियाणे आणि खतांची खरेदी करून ठेवली आहे. काहींनी कर्ज काढून शेतीची तयारी केली असल्याने आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा शिल्लक राहिली आहे. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यास पेरणी लांबली आहे. विशेषत: सोयाबीन उत्पादक शेतकरी वेळेत पावसाची अपेक्षा बाळगून आहेत.
बदलत्या वातावरणामुळे संभ्रम
सकाळी उन्हाचा कडाका आणि दुपारी ढगाळ वातावरण, अशा बदलत्या हवामानाचा शेती नियोजनावर परिणाम होत आहे. लवकर पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतीची कामे वेगाने मार्गी लागतील. त्यामुळे सध्या बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
राज्यातील खरीप पेरणीची स्थिती
खरीपाखालील सरासरी क्षेत्र – १.४४ कोटी हेक्टर
२९ जूनपर्यंत पूर्ण झालेली पेरणी – १०.९४ लाख हेक्टर
गेल्या वर्षी २९ जूनपर्यंत पेरणी – ७६.३० लाख हेक्टर
विभागनिहाय पेरण्या (क्षेत्र हेक्टरमध्ये)
कोकण – ५,७५८
पुणे – ३२,३६४
कोल्हापूर – ७१,९६८
लातूर – ८०,१२७
नागपूर – १,४७,२३७
छ. संभाजीनगर – १,६५,९३५
नाशिक – २,६७,४६१
अमरावती – ३,२३,९६०
एकूण – १०,९४,८०८
















