अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!
मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन मागे, सीजेपीची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट पेपर फुटीप्रकरणी देशभरातून तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पॉवरफुल मंत्री मानले जात होते. त्यांच्या राजीनाम्याने देशभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात आंदोलनामुळे एखाद्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा देण्याची पहिलीच वेळ आहे. जेन झी विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाने हे करून दाखवले. धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केला. सीजेपीच्या आंदोलनाला मिळालेल्या या ऐतिहासिक यशानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, सर्व मागण्या मान्य होताच सीजेपीने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
यापूर्वीही देशात अनेक मोठी आंदोलने झाली, ज्यामध्ये शेतकरी आंदोलन हे सर्वांत मोठे मानले जात होते. त्याशिवाय अनेक विविध मुद्यांवरून आंदोलन झाले. मात्र, मोदी सरकारच्या कार्यकाळात एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नव्हता. सरकारने यापूर्वी विविध मार्ग काढून आणि राजकीय ताकदीचा वापर करून परिस्थिती हाताळली होती. मात्र, यावेळी सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनामुळे सरकारवर एवढा प्रचंड दबाव आला की, मोदी सरकारच्या १२ वर्षांत आंदोलनामुळे पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला.
सीपीजेच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने जेन झी विद्यार्थी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. हे आंदोलन केवळ दिल्लीच्या जंतर-मंतरपुरते मर्यादित न राहता मुंबई, कोलकाता, पुणे आणि देशातील इतर सर्व प्रमुख शहरांमध्ये वेगाने पसरले. या आंदोलनाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम, रील्स आणि मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियाचा केलेला प्रभावी वापर. या डिजिटल क्रांतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी सरकारला पूर्णपणे नामोहरम केले.
दिल्लीतील लाठीचार्ज
अन् आंदोलनाची तीव्रता
२० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच भडकला आणि आंदोलन आणखी तीव्र झाले. यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सीपीजेच्या अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर या जनआक्रोशापुढे सरकारला झुकावे लागले.
विरोधकांमध्ये नवचैतन्य
गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रातील मोदी सरकारला आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की ओढावली. या आंदोलनात काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील इतरही घटकपक्षांनी संसद दणाणून सोडली. सीजेपीचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या विरोधकांनी लावून धरल्या. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे केलेले ठिय्या आंदोलन, गांधी स्मृती भवनात जाऊन गायलेले राष्ट्रगीत यामुळेही विरोधकांची ताकद दिसली. विरोधक एकवटल्याने मोदी सरकारवर दबाव वाढला. यामुळे मोदी सरकार बॅकफूटवर गेले आणि विरोधकात नवचैतन्य संचारले.
जंतर-मंतरवर जल्लोष
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाल्याची बातमी येताच कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुण ढोल-ताशे वाजवत नाचताना आणि विजयोत्सव साजरा करताना दिसले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी स्वत: मध्यस्थी करत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत दिलासा दिला. त्यामुळे जंतरमंतरसह देशभरात तरुणाईने विजयोत्सव साजरा केला.
प्रल्हाद जोशी यांच्याकडे पदभार
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतिक्रिया आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतो आणि शिक्षण मंत्रालयाची ही जबाबदारी आपण संपूर्ण क्षमतेने आणि निष्ठेने पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला. प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच रिन्युएबल एनर्जी मंत्रालयाचा कार्यभार आहे. आता त्यांच्याकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. मी अत्यंत कर्तव्य भावनेने आणि नम्रतेने ही जबाबदारी स्वीकारत आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक केले.
















