लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथील ‘विलासबाग’ येथे सार्वजनिक आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रसिद्ध व बहुआयामी गायिका सौ. वंदना कांबळे यांच्या भक्तिसंगीत आणि ‘संतवाणी’च्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेत्याच्या दूरदूष्टीला व कार्याला उजाळा लोकनेते विलासराव देशमुख हे एक दूरदर्शी नेते आणि सच्चे लोकसेवक होते. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून त्यांनी पंचायत समितीचे उपसभापतीपद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, केंद्रातील कॅबिनेट मंत्रीपद आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीसपद अशा अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळल्या. लोकशाहीच्या मूल्यांना प्राधान्य देणारे नेते होते. त्यांनी लोकशाही मार्गानेच राजकीय यश मिळवले. लोकशाहीमधील सत्तेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्व दिले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हते तर समाजसेवेसाठी होते. त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी शिक्षण, उदयोग, पायाभूत सुविधा, दळवळण, सिंचन, विज्ञान, तंत्रज्ञान, युवक, महिला, आदिवासी यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या. विशेषत: ग्रामीण विकास आणि कृषि क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. सर्व समाज घटकांच्या विकासासाठी काम केले. सामाजिक न्याय आणि समानता याला कायम प्राधान्य दिले. आजही त्यांना राजकारणातील दूरदृष्टी, अभ्यासूवृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले त्यांच्या या महान विचारकार्याला व स्मृतींना उजाळा देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गायिका वंदना कांबळे यांची विशेष स्वरसाधना या आदरांजली सभेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणा-या गायिका सौ. वंदना कांबळे ‘संतवाणी’ आणि भक्तिसंगीत सादर करणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपटगीते, भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते आणि लावणी अशा विविध गीतप्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे.















