निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील सावरी येथे उष्णतेची तीव्रता वाढल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. सावरी येथील शेतकरी मदन श्रीरंग भंडारे यांच्या मालकीचे दोन बैल शेतात शेतमेहनत करून बाधले असताना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक मृत अवस्थेत आढळले. संबंधित घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी पंचांच्या उपस्थितीत पाहणी केली.
सकाळी बैलांकडून नांगरणीचे काम करून घेतल्यानंतर त्यांना झाडाखाली सावलीत बांधण्यात आले होते मात्र, दुपारच्या सुमारास पुन्हा कामासाठी वापर केल्यानंतर संध्याकाळी शेतात बांधून सदर शेतकरी गावाकडे गेला होता रात्री ९ वाजता शेताकडे आले असता बैल जमिनीवर कोसळलेल्या दिसून आले सदर बैलाचा मृत्यू वाढत्या उन्हामुळे त्यांना उष्माघात झाल्याचे समजते. या घटनेचा पंचनामा तलाठी बाळासाहेब मोहोळकर यांनी केला तर औराद शहाजानी येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी ठाकूर यांनी शवविच्छेदन केले आहे.
प्राथमिक माहितीप्रमाणे सदर बैलाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजले. दरम्यान निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी बैल झाडाखाली सावलीस बांधावे पुरेसे पाणी पिण्यास द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचांच्या मते, दोन्ही बैलांचा मृत्यू उष्णतेच्या झळांमुळे झाला असावा. मृत बैलांची एकूण अंदाजे किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

