कपिल सिब्बल यांचे आयोगावर ताशेरे, सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
विधिमंडळातील फूट
राजकीय मानायची का?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटायच्या आधीच शिवसेनेची घटना अमलात होती आणि ती घटना निवडणूक आयोगाने अमान्य केली. पण निवडणूक आयोगाला ती घटना अमान्य करण्याचा अधिकार होता का, असा मोठा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत काही आमदार होते. त्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला. पण विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय फूट मानायची का? असा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी असल्याचा निर्णय दिला. त्यावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारची ही सुनावणी संपली असून पुढची सुनावणी पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे.
सत्तेतील माणसे चुंबकासारखी असतात, ती आधी १६ होती, त्यानंतर ३१ झाले, नंतर ३९ आणि पुढे ते ५६ झाली. सत्तेचा वापर करून त्यांनी माणसे जोडली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आमदार त्यांच्यासोबत गेले, नंतर खासदार त्यांच्यासोबत गेले. या सगळ््या घटना या एकमेकांशी संबंधित आहेत. हा सगळा निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या आधारे झाल्याचा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला.
एकनाथ शिंदे बंड करण्याच्या आधीच शिवसेनेची घटना होती. त्या घटनेत बदल करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना होता का, त्याच्या आधारे निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता का, २०१८ साली जी घटना होती, ती निवडणूक आयोगाकडून अमान्य करण्यात आली. पण ती अमान्य करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला होती का, असा मोठा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला. १७ फेब्रुवारी २०२३ पासून विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष झाला आणि तो घटनाबा आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
दहाव्या अनुसूचीचा दाखला देत सिब्बल यांनी शिंदेंसोबत गेलेले आमदार हे अपात्र ठरतात, असा युक्तिवाद केला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्या गोष्टीला आता दोन वर्षे होऊन गेले, ती विधानसभा संपली, आमदारांचा कार्यकाळ संपला. आता त्यावेळचे आमदार अपात्र करणे, त्यावर युक्तिवाद करणे योग्य आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर सिब्बल यांनी त्या गोष्टीचा परिणाम पुढच्या सगळ््या गोष्टींवर झाला. त्याच्याच आधारे विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे या सगळ््या गोष्टी या एकमेकांशी संबंधित आहेत, असे म्हटले.
मंत्री केले त्या पक्षाची घटना
तुम्ही कशी नाकारू शकता?
उद्धव ठाकरे प्रमुख असताना जी घटना होती, ती शिंदेंनी नाकारली. पण ज्या पक्षाच्या घटनेच्या आधारे आमदार आणि मंत्री झाले, ती घटना कशी नाकारू शकता, असा मोठा सवाल कपिल सिब्बल यांनी केला.
चुकीचा आधार घेत
आयोगाने दिला निर्णय
राष्ट्रीय पक्षामध्ये १६० हून जास्त पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. जी काही फूट पडली होती, ती विधिमंडळ पक्षात पडली होती. पण निवडणूक आयोगाने चुकीचा आधार घेत निर्णय दिल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
















