Homeसंपादकीयअखेर निदा खान अटकेत

अखेर निदा खान अटकेत

नाशिक शहरातील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना सहआरोपी करण्यात आले असून निदाला आश्रय दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २५ मार्चपासून फरार असलेली निदा खान सतत पोलिसांना चकवा देत होती. टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे तसेच कथित धर्मांतर कारवायांमध्ये सक्रिय भूमिका बजावल्याचा तिच्यावर आरोप आहे. अटकेनंतर विशेष तपास पथकाने तपास अधिक तीव्र केला असून या प्रकरणामागे परदेशी निधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला उशिरा रात्री नाशिक रोड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तिच्याकडून दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून या मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्ष, एसआयटी आणि पीडितेच्या वकिलांकडून निदा खानवर गंभीर आरोप करण्यात आले. एचआर अधिकारी म्हणून काम करताना तिने पीडितेला बुरखा आणि धार्मिक पुस्तके दिली. तसेच मोबाईलमध्ये इस्लामिक धार्मिक अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्याचा आरोप आहे. हे सर्व कथित धर्मांतर प्रक्रियेचा भाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने छत्रपती संभाजीनगर परिसरातील कौसर कॉलनी येथे मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेतले. ती आपल्या आई-वडील, भाऊ आणि आत्यासोबत त्या फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती आहे. अटकेनंतर निदा खानला नाशिक रोड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील फरार मुख्य संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यासाठी स्थानिक एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे.

निदा खान गेल्या पाच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्याला होती. नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर तिने कुटुंबासह शहरात येण्याचा निर्णय घेतला. पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन फ्लॅट घेतला होता, जिथे निदा खानला ठेवण्यात आले होते. निदाचा शोध सुरू झाल्यावर नगरसेवक मतीन यांचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. चार-पाच तासांच्या चौकशीनंतर अखेर मतीन यांनी निदाचा ठावठिकाणा सांगितला. मतीन पटेलला या प्रकरणात सहआरोपी केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. लव्ह जिहादला एमआयएम आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे खतपाणी घालत असल्याचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला. जलील यांनी हे सर्व राजकीय आरोप असल्याचे स्पष्ट केले. धर्मांतर करणे, हिंदू मुलींना फसवणे ही कामे एमआयएम आणि इम्तियाज जलील करतात असा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला. जलील यांनी हे आरोप फेटाळताना या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिस करतात, पालकमंत्री शिरसाट नाही असे म्हटले. ते केवळ राजकारण करत आहेत. निदा खानवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. ती चुकीची असेल तर मी तिच्यासोबत राहणार नाही.

पण, तिला यात गोवले जात असेल तर मी पूर्ण ताकदीने तिच्यासोबत असेल असे जलील म्हणाले. जलील यांनी माध्यमांवरही टीका केली. निदाचा भाऊ नाशिकमध्ये एमआयएमचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामार्फत तिने मतीन पटेलशी संपर्क केला. निदा फरार झाल्याने पोलिस तिचा शोध घेत होते. ठाण्यातील मुंब्रा भागात ती असल्याची माहिती मिळाली होती परंतु पोलिस तेथे पोहोचेपर्यंत ती पुन्हा पसार झाली होती. ४० दिवसांहून अधिक काळ तिने पोलिसांना गुंगारा दिला होता. २५ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती. या काळात तिने मुंब्रा, मुंबई आणि भिवंडी सारख्या संवेदनशील भागात आश्रय घेतल्याची माहिती आहे. हा आश्रय कोणी दिला आणि ती कोणाकोणाच्या संपर्कात होती याचा शोध पोलिस घेत आहेत. मतीन पटेलची ओळख कशी झाली आणि या प्रकरणात मालेगाव किंवा मलेशियामधून काही आर्थिक रसद पुरवली जात होती का? या दिशेनेही एसआयटीचा तपास राहणार आहे. निदा खानवर पीडित तरुणी आणि महिलांचा मानसिक छळ करणे, महिलांवर लैंगिक अत्याचार होत असताना बघ्याची भूमिका घेऊन कटात सहभागी होणे, असे गंभीर आरोप आहेत.

धार्मिक भावना दुखावून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी शाहरूख कुरेशी आणि रझा मेमन यांच्याशी मिळून तिने हे षडयंत्र रचल्याचे तपासात आढळून आले आहे. आतापर्यंत आपण केवळ ‘लव्ह जिहाद’ ऐकत होतो, मात्र आता ‘कॉर्पोरेट जिहाद’ नावाचा हा नवा आणि अतिशय धोकादायक प्रकार समोर आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. नाशिक येथील धर्मांतर प्रकरणात ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिची जोरदार पाठराखण केली असून हे संपूर्ण प्रकरण द्वेषभावनेतून रचलेले असून सुशिक्षित मुस्लिम तरुण-तरुणींना विनाकारण त्रास देण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, केवळ आरोप झाले म्हणून एखाद्या मुलीला गुन्हेगार ठरवणे चुकीचे आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर ‘मीडिया ट्रायल’ सुरू असून तिला आधीच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. निदा खान निर्दोष आहे आणि न्यायालय तिला नक्कीच न्याय देईल. एखाद्या व्यक्तीच्या घरात बुरखा, नकाब किंवा धार्मिक ग्रंथ सापडणे, हा गुन्हा कधीपासून झाला? असा सवाल त्यांनी केला. बुरखा किंवा धार्मिक पुस्तक ही काही आक्षेपार्ह वस्तू नाही, मग त्यावरून गुन्हेगारी शिक्कामोर्तब कसे केले जाऊ शकते? असा सवालही त्यांनी केला. निदा खान एचआर विभागात कार्यरत नव्हती, तिची बदली झाल्याने तिचा कंपनीशी थेट संबंध उरला नव्हता. त्यामुळे तिला मुख्य सूत्रधार ठरवणे तर्कहीन आहे असे ते म्हणाले. मुस्लिम समुदायातील उच्चशिक्षित पिढीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही सारी कारवाई केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणातील तक्रार सत्ताधारी पक्षातील नेत्याने दाखल केल्याकडे लक्ष वेधून, ओवेसी यांनी यामागे राजकीय हेतू असल्याचे संकेत दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR