मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण मिटवण्यासाठी जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे यात काहीच शंका नाही. खरातला इतक्या गोष्टी माहिती असाव्यात की त्या बाहेर येऊ नयेत म्हणून खरातचे काही बरे-वाईट केले जाईल ही भीती त्याच्यासह आम्हा सर्वांना आहे. प्रकरण दाबायचे असेल तर त्याच्या जीवाचे काही बरे-वाईट करत फाईल बंद करण्यात येईल. हे होऊ नये म्हणून त्याला सुरक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. राज्यात रोज नव्या भोंदूबाबांची प्रकरणे समोर येत आहेत, आपण काय करतो आहोत, असा प्रश्न पडला आहे.
राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलिस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
खरातचे वक्तव्य काय
नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दररोज तासन्तास चालणा-या चौकशीमुळे त्याच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर चौकशीदरम्यान त्याने, मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझे मरण इथेच आहे, असे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

