लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान तपासण्यासाठी शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी स लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘वेध गुणवत्ता’ पूर्व चाचणीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. लातूर शहर महानगरपालिकेच आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्या विशेष संकल्पनेतून आणि उपायुक्त वसुधा फड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (ठएढ २०२०) आणि ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर शासनाचा भर आहे. याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या चाचणीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अर्थपूर्ण वाचन आणि गणितीय ज्ञान: विद्यार्थ्यांना केवळ मुळाक्षरे ओळखता येऊ नयेत, तर त्यांनी मजकूर अर्थ समजून घेऊन वाचावा आणि मूलभूत गणितीय क्रियांचा (बेरीज, वजाबाकी इत्यादी) दैनंदिन जीवनात वापर करता यावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन आणि गणितातील मूलभूत कौशल्ये १०० टक्के प्राप्त करावीत, यासाठी विद्यार्थ्यांची सद्यस्थिती तपासणे या चाचणीतून शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम झाल्यास त्यांना पुढील वर्गातील अभ्यास सोपा जातो, ज्यामुळे शाळेतील गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होते. या पूर्व चाचणीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याची अचूक शैक्षणिक पातळी निश्चित केली जाणार आहे. या प्राप्त अहवालानुसार, ज्या विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे,
त्यांच्यासाठी मनपा शाळांमध्ये विशेष ‘उपचारात्मक अध्यापन’ राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार, सर्व मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि नियुक्त पर्यवेक्षकांच्या सहकार्याने ही परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. मा. आयुक्त आणि मा. उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रातून आणि पालक वर्गातून मोठ्या प्रमाणावर स्वागत व कौतुक केले जात आहे.
















