जळकोट : प्रतिनिधी
तालुक्यात ३० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दिवसभर झालेल्या दमदार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले असून तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता सध्या तरी दूर झाली आहे.
महसूल विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जळकोट मंडळात ७५ मिमी, तर घोणसी मंडळात ७२ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील एकूण पर्जन्यमान १४७ मिमी असून सरासरी पर्जन्यमान ७३.५ मिमी इतके नोंदविण्यात आले आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे तलाव, शेततळी आणि लघु प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. याचा फायदा पिण्याच्या पाणीपुरवठ्यासह शेतीलाही होणार असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक गावांतील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे . जळकोट तालुक्यामध्ये जून महिन्यात चांगला पाऊस झाला होता एकाच दिवशी झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातील अनेक साठवण तलाव ९० टक्के भरले होते तर काही साठवण तलावामध्ये ५० टक्के पाणी साठा जमा झाला होता. आता ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणखीन साठवण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे.
जळकोट तालुक्यात अल निनोचा प्रभाव जाणवेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र सद्यस्थितीत जळकोट तालुका तसेच परिसरामध्ये दमदार पाऊस पडत आहे . यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच कोरडे पडलेले जलस्त्रोत पुन्हा भरू लागलेले आहेत.
















