करमाळा: उन्हाचा वाढता चटका, अवकाळी पाऊस अन् वायली बारे यामुळे काढणी होत असलेल्या कांद्याची साठवण क्षमता घटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कांदा लगेच विकावा की साठवणूक करून ठेवावा ? या द्विधा मनःस्थितीत सध्या कांदा उत्पादक सापडला आहे.
गतवर्षी कमी पर्जन्यमानामुळे सध्या सगळीकडे पाणीटंचाई भासत असली तरी शेतकऱ्यांनी दोन पैसे राहतील म्हणून कांद्याचे पीक घेतले . पण कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. कांद्याचे दर स्थिर राहिलेले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दुष्काळात पार बिघडून गेले आहे, मोठा उत्पादन खर्च करूनही हाती काही राहात नाही, अशी स्थिती शेतकर्यांची झाली आहे. सध्या कांद्याला प्रतवारीनुसार २० ते १४० रूपये याप्रमाणे दर मिळत आहे.
त्यातच गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. करमाळा तालुक्यातील शेतक-यांनीही कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. काही शेतकर्यांनी कांदा काढला आणि शेताच्या बांधावर ठेवला आहे.अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे महागडे कागद खरेदी करून कांदा झाकावा लागत आहे. अगोदरच कांद्याला योग्य भाव मिळत नाही अन् कागदाचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले. यामुळे कांदा सडून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती आहे.शासनाने कांद्याच्या दराबाबत दिलासादायक निर्णय घेण्याची गरज असून कमीत कमी २० रुपये हमीभाव द्यावा अशी शेतकर्यांची मागणी आहे.