कळंब : सतीश टोणगे
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान पार पडले. मिळणा-या मतांच्या आकडेवारीवरून गावागावांमध्ये तर्कवितर्क व कार्यकर्त्यांकडून अंदाज बांधण्यात येत आहेत. बूथवरील मतदानाची आकडेवारी गोळा करून मिळणारी मते आणि विजयाचा अंदाज लावण्यावर भर दिला जात आहे. मतमोजणीला अजून भरपूर वेळ आहे. त्यामुळे हा संपूर्ण वेळ जीव मुठीत घेऊनच उमेदवारांना राहावे लागणार आहे.
उमेदवारांना मशिनमधून बाहेर येणारा आकडा पाहण्यासाठी तीन आठवडे वाट पाहावी लागेल. निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्येच थेट ‘फाईट’ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा निकालाचा अंदाज बांधणे अवघड असले तरी प्रत्यक्षात सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात कुणाचा दावा खरा ठरेल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. परंतु आता सुरुवातीच्या टप्प्यात मिळणा-या मतांचा अंदाजच लावण्याच्या प्रयत्नात उमेदवार आहे. काही क्षेत्र, भागातील मतदारांचे झुकते माप असल्याचा अंदाज संबंधित पक्ष, उमेदवाराला असतो.
गावागावांमधून आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना मतांची आघाडी देण्यासाठी गावपुढा-यांची कसरत चालू होती..आपलाच उमेदवार कसा पुढे राहील यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. ज्या गावांमधून ‘लीड’ जास्त त्या गावातील गावपुढा-यांचे राजकीय वजन जिल्हा, तालुक्यावर वाढते, त्यामुळे गाव पुढा-यांनी जोरात प्रयत्न केल्याचे दिसून आले.
मतदान झाले तरी आता पारावर, पानपट्टीवर, हॉटेलात, कोण जिंकणार, गुलाल कोण उधळणार यावर चर्चा झडू लागल्या आहेत. शर्यती लावून निष्ठा दाखवली जात आहे…..गावात कोण फुटले, कुणी गद्दारी केली, कोणी किती पैसे घेतले यावरची कुजबूज वाढू लागली आहे…..गुलाल तर आम्हीच उधळणार…हे उमेदवाराच्या कार्यकर्त्याला वाटू लागले आहे. पण ज्येष्ठ मंडळी मात्र, ‘झालं इलेक्शन जपा रिलेशन’ असे सांगत आहेत.