लातूर : प्रतिनिधी
देश व राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी एनटीएकडून लातूर जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर ‘नीट’ची परीक्षा पार पडली. या ५४ परीक्षा केंद्रांवर २४ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्याबाहेरून व इतर तालुक्यांतून पाल्यांना नीटच्या परीक्षा केंद्रापर्यंत घेऊन जाणे व परीक्षा संपेपर्यंत कडक उन्हात झाडाच्या व भितींच्या सावलीत बसून पालकांनाही एक प्रकारे या परीक्षेला सामोरे जावे लागले तसेच जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी आल्याने वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्राच्या गेटवरच विद्यार्थ्यांची चौकशी करूनच गेटमध्ये प्रवेश देण्यात आला. नीटच्या परीक्षेसाठी हॉलमध्ये विद्यार्थ्यांना पेन दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी इतर कोणतेही साहित्य घेऊन येऊ नये. मोबाइल, घड्याळ, ब्रेसलेट, कॅमे-यास सक्त मनाई करण्यात आली. पारदर्शक पाण्याची बाटली वगळता कोणतेही साहित्य घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील ५४ परीक्षा केंद्रांवर या वर्षाची नीटची परीक्षा रविवार, दि. ५ मे रोजी पार पडली. यात लातूर शहरात ४५, निलंगा ३, उदगीर ३, अहमदपूर येथे २ परीक्षा केंद्रांचा समावेश होता. एनटीएच्या पथकामार्फत सर्वच परीक्षा केंद्रांवर जय्यत तयारी करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० पर्यंत नीटच्या परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला. नीटच्या परीक्षेकरीता जिल्ह्यातील ५४ परीक्षा केंद्रांवर २४ हजार ८८२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली तर २७० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले.