६ जण गंभीर जखमी, सर्व भाविक तेलंगणातील
नांदेड : प्रतिनिधी
मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणा-या भाविकांच्या कमांडर जीपला किनवट तालुक्यात भीषण अपघात झाला. तोटंबा घाटात भरधाव जीप रस्त्यालगतच्या झाडावर आदळून चौघांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
श्रावण मासानिमित्त तेलंगणातील कुबीर मंडळातील पारडी (बी) येथील रहिवासी असलेले १० ते १२ भाविक नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते सायंकाळी कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत असताना तोटंबा घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यावेळी जीप (क्र. एपी २५ एएच ६७४७) रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि या भीषण दुर्घटनेत ३ भाविकांचा जागीच तर चालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तुम सायलू (६०), तुम गौराबाई (६०), आवला गंगाधर (५५, रा. पार्डी, ता. कुबेर, जि. निर्मल, तेलंगणा) यांच्यासह चौघांचा समावेश आहे. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी म्हैसा येथे हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी वाहनाने तेलंगणातील म्हैसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या दुर्घटनेने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
















