पुणे : गणेशोत्सवामुळे देवाला वाहणा-या तोरणाच्या नारळासह मोदक, करंज्या आदीसाठी वापरण्यात येणा-या नारळांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात रोज २ ते २.५ लाख नारळांची विक्री होत आहे.
उत्सव काळात ही मागणी कायम राहणार असल्याचा अंदाज मार्केटयार्डमधील नारळ व्यापा-यांनी व्यक्त केला. मागील दोन महिन्यांत शेकड्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. दरवर्षीच उत्सव काळात नारळांना मागणी वाढत असते. यंदाही मागणी कायम आहे. केटरिंगवाले, विविध प्रकारचा प्रसाद विक्रेत्यांसह नारळ विक्रेत्यांकडून मागणी वाढली आहे.
पुढील काळातील सण आणि उत्सवामुळे दिवाळीपर्यंत वाढलेली मागणी कायम राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत बाजारात तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नारळाची आवक होत आहे. गणेशोत्सव आणि नारळांचे तोरण हे समीकरणच आहे.
















