लातूर : प्रतिनिधी
सध्या जिल्ह्यातील उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. मागील आठवड्यापासून शहरासह ग्रामिण भागात कमाल व किमान तापमानात जोरदार वाढ होत असून, सोमवार ४० अंशांवर असलेले तापमान मंगळवारी ४१ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसूून येत होता.
शहरातील हवामान केंद्रावर मंगळवारी कमाल ३८ तर किमान ४१ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. या वर्षीच्या उन्हाळ्यातील हे उच्चांकी तापमान असून, उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय, रसाळ फळांना पसंती देत आहेत. उन्हापासून बचाव होण्यासाठी डोक्याला पांढरा कपडा, छत्री किंवा झाडाची सावली शोधताना नागरिक दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उकाडा वाढला आहे.
ऐन लोकसभा मतदानाच्या दिवशी जिल्ह्याचा पारा चागलाच चढलेला दिसून येत होता. गेल्या आठवड्यापासून आकाशातूनही सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांनी जिल्हा चांगलाच तापला आहे. वातावरणात अचानक उकाडा वाढल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोपी, स्कार्फ, गॉगलचा वापर करताना दिसत आहेत. उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत असल्याने घशाला लवकर कोरड पडत आहे. आपली तहान भागवण्यासाठी ल्ािंबू सरबतासारखी थंड पेय मिळण्याला पसंती दिले जात आहे.