मुंबई : भिवंडीत पोलिसांनी छापा टाकला आणि आज होणारा ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाले. परीक्षा पुढे ढकलली गेली, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणा-या माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींचं काय? असा संतप्त सवाल मनसे नेते, अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सिस्टीमच्या नालायकीमुळे आज देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, टोकाचं पाऊल उचलतोय. सरकार मात्र ‘ऑपरेशन टायगर’ करण्यात मग्न आहे, अशी टीका अमित ठाकरेंनी केली आहे.
अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, अजून किती? परवा मध्यरात्री भिवंडीत पोलिसांनी छापा टाकला आणि आज होणारा ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाले. परीक्षा पुढे ढकलली गेली, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणा-या माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींचं काय? परीक्षा म्हणजे उमेदवारांची योग्यता ओळखण्याची संधी असायची, पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र आणि देशातील ‘संधिसाधूंनी’ परीक्षा हा ‘प्रश्नपत्रिका विकण्याचा ‘अधिकृत धंदा’ बनवला आहे!
देशात गाजलेल्या ‘नीट’ परीक्षेचा घोटाळा असो, की महाराष्ट्रातील ‘सीईटी’चा निकाल; ज्या मुलांना दहावी-बारावीत साधे पासिंग मार्क्स मिळाले होते, ती मुलं चक्क १०० टक्के मिळवून टॉपर येतात! हा कोणता चमत्कार? ज्या राज्याला शिक्षणाचा वारसा आहे, तिथे बारावीच्या परीक्षेत ड्रोन लावून कॉपी रॅकेट पकडावं लागतं आणि १०७ केंद्रं ब्लॅकलिस्ट करावी लागतात, ही आहे का महाराष्ट्राची प्रगती? तलाठी भरती, पोलिस भरती, एमपीएससी, नीट, सीईटी आणि आता टीईटी.. तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडलीय का? असा प्रश्न अमित ठाकरेंनी विचारला आहे.
मला सरकारला आणि शिक्षण खात्याला विचारायचं आहे, तुम्ही जे पेपरफुटीविरोधी कडक कायदे आणण्याच्या पोकळ बाता मारता, ते कायदे काय फक्त मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी आहेत का? मंत्रालयाच्या आशीर्वादाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणा-या मुख्य सूत्रधारांना अटक नक्की होणार तरी आहे का? की दरवेळीप्रमाणे ‘आम्ही चौकशी समिती नेमलीय’ हा नेहमीचा गुळगुळीत डायलॉग पुढे करून तुम्ही मोकळे होणार आहात? आज गरीब आणि मध्यमवर्गीय घरातला तरुण दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून अभ्यास करतोय. त्याची चूक एवढीच, की तो लाच देऊन पेपर विकत घेऊ शकत नाही!
सिस्टीमच्या या नालायकीमुळे आज देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, टोकाचं पाऊल उचलतोय.. आणि सरकार मात्र ‘ऑपरेशन टायगर’ करण्यात मग्न आहे! असा हल्लाबोल अमित ठाकरेंनी केला आहे.
किमान आता तरी तुमचं हे घाणेरडं राजकारण आणि पोकळ भाषणं बाजूला ठेवा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणा-या त्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.
















