लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात गुरूवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी अधुन-मधून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दुपारी २ पासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. थोडया उघडीप नंतर सायंकाळपर्यंत पावसाच्या सुरूच होत्या. दिवसभर सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळामुळे तापमानात घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या तिन दिवसापासून नागरीकांना भर उन्हाळयात उकाडयापासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने नागरीकांच्या अंगाची लाहीलाही होत होत होती. हवामान विभागाने दिलेल्या इशा-या नुसार गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाऊसाने सोसाटयाच्या वा-यासह धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतक-यांच्या काढणीस आलेल्या ज्वारी, गहू पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सध्या द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्यात असून आंब्याच्या बागा जोमात असताना वादळी वारा व आवकाळी पावसामुळे या फळबागांचे मोठया प्रमणात नुकसान झाले आहे. कांही ठिकाणी विजा पडून पशुधन दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याभरात काही ठिकाणी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. जिल्ह्यात मंगळवार, बुधवार पासून वादळीवा-यासह पाऊस पडत आहे. गुरूवारीही दुपार पासूनच सायंकाळपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच शहरातील फळ-भाजी विके्रते यांची आवकाळी पावसामुळे तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.