अमरावती : प्रतिनिधी
राज्यसभेच्या या जागेसाठी माजी खासदार, भाजप नेत्या नवतीन राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेशाची अट घालण्यात आली होती. नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करून राज्यसभेच्या उमेदवारीबाबत नेमकं काय घडलं? याची संपूर्ण माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नवनीत राणा यांनी पोस्ट करत लिहिले की, आधुनिक भारताची उभारणी करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब, निर्भीड व कणखर गृहमंत्री मा. अमितजी शहा साहेब व महाराष्ट्राचे कार्यसम्राट व जननायक मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही.
मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करीत राहील. (आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्याबाबत विनंती केली होती, मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झाले नाही.
‘आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मन:पूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती.
सुनेत्रा पवारांचे मानले आभार
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरीदेखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी व पार्थदादा पवार यांची आभारी आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले आहे.
















