लातूर : प्रतिनिधी
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील बी. एस्सी. बी. टी. प्रथम वर्षातील पर्णवी ढवारे या विद्यार्थीनींने अनहद सोशल फाऊंडेशनच्या ‘राईट टू लव्ह’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘आंतरजातीय विवाह: एक सामाजिक क्रांती’ या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या सदरील स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २२ उत्कृष्ट निबंध सादर करण्यात आलेले होते. त्यातून तिने प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्यल साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते बुके व पुस्तक देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, इंग्रजी विभाग प्रमुख व साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ प्रभारी प्रा. मेघा पंडित, हिंदी विभाग प्रमुख डॉ. गजानन बने, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर स्वामी, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. विजेंद्र चौधरी, मराठी विभाग प्रमुख डॉ. रामशेट्टी शेटकार, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. कोमल गोमारे, सुनील राक्षे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही तिचे अभिनंदन व कौतुक केले.