नाशिक : प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची धूम आहे.उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नेते बंड करण्याच्या भूमिकेत आहेत. असे अनेक बंड थोपवताना नेत्यांची दमछाक होत आहे. नुकतेच बारामती लोकसभा मतदारसंघातील बंडखोरी शमविण्यात महायुतीला यश आले असले तरी दिंडोरी या मतदारसंघामुळे आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. येथे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. ते अपक्ष म्हणून ही निवडणूक लढतील. भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना तिकिट दिले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या जोमात प्रचार करत आहेत. काहीही झालं तरी मीच जिंकणार, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र हरिश्चंद्र्र चव्हाण हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शरद पवारांकडून भास्कर भगरेंना तिकिट
याआधी भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीने येथून भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. शेवटी पर्याय शिल्लक नसल्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात.
माकप लवकरच भूमिका जाहीर करणार
दुसरीकडे दिंडोरी लोकसभेची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे इंडिया आघाडीचा भाग असलेल्या माकपने नाराजी व्यक्त केली आहे. दिंडोरीची जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी माकपने केली होती. मात्र यात त्यांना यश आले नाही.