धाराशिव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गूढ आणि प्रचंड मोठ्या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव, कळंब, वाशी आणि भूम परिसरात हे आवाज ऐकू येत असून, अनेक ठिकाणी घरातील भांडी, दरवाजे आणि खिडक्या हादरल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. यापूर्वीही अशा स्वरूपाचे आवाज ऐकू आले होते, मात्र यावेळी आवाजाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
दरम्यान, कळंब-धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी कडे पडताळणीसाठी माहिती पाठवली होती. ठउर च्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही.
या गूढ आवाजामागे भूगर्भातील नैसर्गिक हालचाली कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, प्रशासनाकडून देण्यात येणा-या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सतत येणा-या गूढ आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे.

