नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात हुकूमशाही आली आहे. मात्र आम्ही या हुकूमशाहीचा सामना जनतेच्या दरबारात करणार आहोत. निवडणूक रोखेचा घोटाळा समोर आल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यामुळे खरे ठग कोण हे निवडणूक रोख्यांमधून कळाले आहे. भाजपमध्ये सगळे भ्रष्ट घेतले आहेत.
भाजपमधील सर्व ठगांच्या केसेस मागे घेतल्या जात असल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
निवडणुकीच्या तोंडावर सोरेन आणि केजरीवाल यांना सरकारने अटक केली आहे. देशात हुकूमशाही आली आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ‘सावरकरांवर सातत्याने टीका करणा-या राहुल गांधी यांनी हा चित्रपट पाहावा, त्यांच्यासाठी थिएटर बूक करण्याचा खर्च मी करतो’, असा खोचक टोला लगावला होता. त्याबाबत प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला ‘मी देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण जाण्याचा-येण्याचा खर्च करतो, त्यांचा हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावे. त्यांनी लडाखमध्येही जाऊन यावे. मी खर्च करायला तयार आहे. दार्जिलिंगमध्ये एका व्यक्तीला दिलेली वचनं कशी मोडली ते भेटून माहिती घ्यावी. अरुणाचलमध्ये जाऊन यावं. त्यांच्या जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे.’अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.