शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील पांढरवाडी तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असताना शेतीसाठी बेसुमार पाणीउपसा सुरू असल्याने येरोळसह चार गावांवर आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या तलावातील उपलब्ध पाणीसाठा जपण्याऐवजी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसले जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पांढरवाडी तलावातून तालुक्यातील येरोळसह पांढरवाडी, हनमंतवाडी आणि जांभळवाडी या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. येरोळ हे तालुक्यातील मोठे गाव असून, मोठ्या लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा भार याच तलावावर आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा कमी होत असताना त्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान काही शेतक-यांकडून विद्युत मोटारीद्वारे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू असल्याने तलावातील पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झाला नसताना तलावातील उपलब्ध पाणीही शेतीसाठी उपसले जात असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन येरोळ ग्रामपंचायतीने पांढरवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी शिरूर अनंतपाळ तहसील प्रशासनाकडे केली आहे मात्र, या मागणीवर अद्याप प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. तलावातील पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवून शेतीसाठी होणारा बेसुमार पाणीउपसा तातडीने थांबवावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर उन्हाळ्यापूर्वीच येरोळसह चार गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. पाणीटंचाई निर्माण होण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रशासनाने आताच तलावातील पाणीउपशावर नियंत्रण आणून उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करावे, अशी मागणी सरपंच सतीश शिंदाळकर व ग्रामस्थांकडून होत आहे.
















