लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पानगाव येथील श्री विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी १० कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला. याबदल श्री विठ्ठल मंदीर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आमदार धिरज देशमुख यांचा पानगाव येथे बुधवार दि. ६ मार्च रोजी जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत, नायब तहसीलदार श्रावण उगले, लातूर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, श्री विठ्ठल मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, रेणाचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, चंद्रकांत आरडले, रमेश सूर्यवंशी, शेषराव हाके पाटील, स्वाती उमेश सोमाणी, सरपंच गयाबाई कस्पटे, उपसरपंच शिवाजीराव आचार्य, विवेक चव्हाण, सिद्धेश्वर गालफाडे, उमर पठाण, अभिजीत चव्हाण, किरण हनवते, गजानन फुलारी, बी. आचार्य, संजय हरिदास, सिध्देश्वर आचार्य, विश्वनाथ कागले, प्रवीण माने, मुकेश राजमाने, बाळासाहेब करमुडे, गुलाबराव चव्हाण उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री विठ्ठल मंदीर हे वास्तूशिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. येथे अनेक शिल्प कोरली गेलेली असून हे मंदिर ११ व्या शतकातील असावे, असे म्हंटले जाते. त्यामुळे या पुरातन वास्तूचे जतन झाले पाहिजे यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. सरकारकडे पाठपुरावा केला होता. अमित विलासराव देशमुख हे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांतून या मंदिराचा विकास आराखडा तयार झाला. त्यामुळेच ९ कोटी ३५ लाख रुपयांचा हा निधी मंजूर होऊ शकला, याचा आनंद आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल शासनाचेही मी आभार मानतो. या मंदिराच्या विकासासाठी आणखी ८ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. तोही शासनाकडून आम्ही मंजूर करून आणू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.