लातूर : प्रतिनिधी
पुण्यात शिक्षणासाठी असलेल्या लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथील विद्यार्थीनीच्या खून प्रकारणाचा कसून तपास करावा, हे प्रकरणा जलदगती न्यायालयात चालवावे, आरोपींना कडक शासन चालवावे यासाठी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांना या संदर्भाने पाठविलेल्या पत्रात माजी मंत्री आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथील भाग्यश्री सुर्यकांत सुडे ही विद्यार्थीनी पुणे येथे अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होती.
या विद्यार्थीनीचे खंडणीसाठी अपहरण करून तिचा खून झाल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालक आणि विद्यार्थ्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्राच्या एकुण लौकीकाला या घटनेमुळे धक्का बसला आहे. या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना अटकही झाली आहे, असे असले तरी या प्रकारणचा कसून तपास होणे आवश्यक आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कडक शासन होण्यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, त्याच बरोबर या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी अशी मागणीही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.