जालना : लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असताना अजूनही अनेक मतदारसंघांत उमेदवारच ठरत नसल्याचे चित्र आहे. अशीच काही अवस्था जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपकडून रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यांनी प्रचारही सुरू केला, मात्र महाविकास आघाडीत अजूनही जालन्यातील उमेदवारच निश्चित होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार असून, माजी आमदार कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे. पण यावर कोणतीही अधिकृत घोषणा होताना दिसत नाही.
जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील पाच लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा सतत या मतदारसंघातून विजय होताना पाहायला मिळाले. आता सहाव्यांदा रावसाहेब दानवे या मतदारसंघातून आपलं नशीब अजमावत आहेत. पण यंदाच्या निवडणुकीत विरोधकांना दानवेंना तोड देणारा दमदार उमेदवार अजूनही मिळाला नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला हा मतदारसंघ सुटला असून, काँग्रेसकडून चांगल्या उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. अशात माजी आमदार कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे. काळे यांनी २००९ मध्ये देखील दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवत चांगली लढत दिली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या ८ हजार ४८२ मतांनी पराभव झाला होता.