मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध भागांतून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले तब्बल २०० भाविक सध्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे अडकून पडले आहेत. यात्रेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, परवानगी आणि प्रक्रिया पूर्ण करूनही चीनकडून व्हिसा मंजूर न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंनी वेळेत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. तसेच कैलास मानसरोवर यात्रेसाठी लागणारे परमिटही त्यांना मिळाले होते. मात्र, चिनी दूतावासाकडून अद्याप व्हिसा जारी करण्यात आलेला नाही. परिणामी महाराष्ट्रातील सुमारे २०० भाविकांना काठमांडूमध्येच थांबावे लागत आहे. यामध्ये पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर भागांतील भाविकांचा समावेश आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अडकलेल्या भाविकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. भाविकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या स्तरावरही याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही भाविकांच्या नातेवाईकांनी मदतीची विनंती केली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही व्हिसा न मिळाल्याने यात्रेकरूंना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत बीजिंगमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून चीन सरकारशी आवश्यक समन्वय सुरू आहे. सोमवारी चिनी दूतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या काठमांडूमध्ये अडकलेले सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
















