पुणे : प्रतिनिधी
राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रात तब्बल ५२६ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यापैकी सर्वाधिक ४५२ शाळा मुंबई विभागातील आहेत. शासनाची मान्यता आणि यू-डायस क्रमांक घेणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करून या शाळा सुरू असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. राज्यातील अनधिकृत शाळांपैकी ४३ शाळा बंद करण्यात आल्या असून, १५५ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच ४२२ शाळांना नोटीस बजावण्यात आली किंवा दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई विभागातील ४५२ अनधिकृत शाळांपैकी २३ शाळा बंद करण्यात आल्या, तर १४९ शाळांवर एफआयआर दाखल झाला आहे. ३९६ शाळांवर नोटीस किंवा दंडाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागात ५३ अनधिकृत शाळा असून, त्यापैकी १४ शाळा बंद आणि नऊ शाळांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नागपूर विभागात ११ अनधिकृत शाळांची नोंद असून, पाच शाळा बंद करण्यात आल्या आहेत. चार शाळांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नाशिक विभागात चार, अमरावतीत दोन आणि संभाजीनगर विभागात चार अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. कोल्हापूर आणि लातूर विभागात मात्र एकही अनधिकृत शाळा नोंदलेली नाही. दरम्यान, मान्यता नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शिक्षण सुरूच असल्याने शिक्षण विभागाच्या कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
















