पूर्णा : शहरातील पंचशील नगरातील बंडू गायकवाड यांच्या घरासमोर मागील तब्बल १५ वर्षांपासून वीजेचा पोल नसल्याने विद्युत तारा अक्षरश: धोकादायक पद्धतीने खाली लोंबकळत होत्या. हाताला लागतील इतक्या खाली आलेल्या तारांमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक गौतम भोळे यांनी घेतलेला पुढाकारामुळे लोंबकळणा-या तारांपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या समस्येबाबत बंडू गायकवाड यांनी संबंधित विभागाकडे वारंवार लेखी अर्ज देत पाठपुरावा केला. मात्र अनेकवर्षे उलटूनही प्रश्न सुटला नाही. अखेर त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक भोळे यांच्याकडे आपली समस्या मांडली. नागरिकांची अडचण गांभीर्याने घेत भोळे यांनी स्वत: पुढाकार घेत महावितरण विभागाशी समन्वय साधला. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम अवघ्या ५ ते १० दिवसांतच मार्गी लावत दि. ८ ऑगस्ट रोजी नवीन वीज पोल बसवून घेतला. यामुळे केवळ गायकवाड यांच्या घरासमोरील समस्या दूर झाली नसून, संपूर्ण परिसरातील नागरिकांना धोकादायक लोंबकळणा-या विद्युत तारांपासून मोठा दिलासा मिळाला आहे. संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वाचे ठरले आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करून दाखविल्याबद्दल नगरसेवक भोळे यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अल्पावधीत मार्गी लावल्याने त्यांच्या कर्तव्यतत्परतेचे आणि विकासकामांतील सक्रिय भूमिकेचे नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.
















