लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या गरीब शेतक-यांची मुलं, मुली आज डॉक्टर, इंजिनियर, उच्चपदस्थ अधिकारी बनवण्याचे मोठे कार्य लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक मदतीने होत आहे. आपले हे सर्वांचे पुण्य आहे. मात्र भावनेच्या आहारी जाऊ नका अन्यथा बाजूच्या परिसरातील जिल्हा बँकेसारखी परिस्थीती निर्माण होईल, हे होऊ द्यायचे नसेल तर भविष्य घडवणा-या चांगले कार्यक्षम उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा. कामाला लागा सतर्क राहा. आजतागायत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत शेतक-यांना आधार देण्याचे आकाशाएवढे मोठ कार्य केले आहे. पुढची पिढी चांगल काम करत आहे. लातूरच्या लाखो लोकांचे संसार उभे केलेल्या सात मजलीची इमारत ताठ मानेने उभी आहे. आपल्या भविष्यासाठी शेतक-यांचे हित जपण्यासाठी चांगल्या कार्यक्षम उमेदवारांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूक-२०२६ अनुषंगाने लातूर व रेणापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी, मजूर, पतसंस्था, मत्स्य सभासद यांची संवाद बैठक हॉटेल वाडा येथे बुधवारी घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ टेकाळे, जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, राजकुमार पाटील, अनुप शेळके, पृथ्वीराज शिरसाठ, संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, सौ. अनिता केंद्रे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमेश बेद्रे, रेणापूर तालुका अध्यक्ष प्रमोद कापसे, जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन जगन्नाथ पाटील, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलग्रे, उपसभापती शेषराव हाके, रवी काळे, गणेश एस. आर. देशमुख, मिडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी, सुरेश लहाने, मदन भिसे, संभाजी सूळ, प्रभाकर केंद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा बँकेने राजकारण न करता जिल्ह्यातील बालाघाट, मारुती महाराज, किल्लारी, निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, तोंडार येथील साखर कारखान्याना आर्थिक मदत केली असून जिल्ह्यातील सर्वांचा सन्मान वाढेल असे कार्य सुरू आहे. सध्याच्या संचालकांनी खूप चांगले काम केले आहे. अनेक चांगले निर्णय घेऊन शेतक-यांना आर्थिक मदत केली आहे. त्याचबरोबर १०० कोटी रुपयांचा नफा झाला. दूरदृष्टी असल्याने अनेक निर्णय घेतले. त्यात ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज वाटप करणारी देशातील पहिली बँॅक ठरली असून आगामी काळात होणा-या बँकेच्या निवडणुकीत चांगले कार्य करण्यासाठी कार्यक्षम उमेदवारांना देऊ. त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
यावेळी माजी आमदार तथा विलास साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील यांनी विचार मांडले. संवाद बैठकीला लातूर, रेणापूर तालुक्यातील सोसायटी चेअरमन, पतसंस्था मजूर, मत्स संस्थेचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालिक सौ अनिता केंद्रे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले.
केलेल्या चांगल्या कार्यातील सातत्य राखण्यासाठी दिलीपराव देशमुख यांच्याकडे बघून मतदान करा
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे १२ लाख खातेदार तर २.५० लाख लोकांना पीक कर्ज पुरवठा करणारी ही बँक असून आपण कोणाच्या मागे जायचे आहे, हे आज ठरवण्याची गरज आहे. ७० कोटीं वार्षिक पगार कर्मचा-यांना देणारी व १०० कोटी रुपयांचा नफा असणारी ही बँक अतिशय पारदर्शक कारभार करत काटकसर करत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असताना ४० वर्षापासून पाया मजबूत ठेवलेला. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळत आहोत, असे सांगून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख पुढे म्हणाले, आगामी काळात जिल्हा बँकेच्या नवीन शाखेचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत चांगले काम केले आहे. बँकेची नोकर भरती अतिशय पारदर्शक करून ३७५ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वेगवेगळ्या योजनेतून शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असून आगामी काळातही चांगल्या कामाला गती देण्यासाठी आपल्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले.
















