नवी दिल्ली : फायनान्स सेक्टरमधील कंपनी पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. मी महाराष्ट्रातील लातूरचा रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षापासून मी लातूरमधील बदल जवळून पाहत आहे. सरकारने डिजिटल युगाला सुरुवात केली. त्यामुळे छोट्या शहरातील आमच्या सारख्या अनेकांना असंख्य अडचणींवर मात करता आली आहे असे अभय भुतडा यांनी सांगितले. ते एका ग्लोबल समीटमध्ये बोलत होते.
लातूरसारख्या छोट्या शहरातही बदल होत आहे. हे माझे शहर आहे. मी या शहरात अनेक बदल होताना पाहिले आहेत. देशातील डिजिटल क्रांतीने छोट्या शहरातील लोकांच्यासमोरील अनेक अडचणी संपविण्याचे काम केले आहे. राष्ट्र निर्माणासाठी तुम्ही योगदान देत आहात हा विश्वास त्यातून निर्माण झाला आहे असे अभय भुतडा म्हणाले. भारतात यावेळी डीजिटल क्रांती होत आहे. या डिजिटल क्रांतीने डिजिटल आणि टेक सोल्यूशन्ससाठी एक नवे मार्केट तयार केले आहे. भारत सरकारची पंतप्रधान जनधन योजना, यूपीआय आणि भीम सारख्या योजनांना लोकांमध्ये सर्वसमावेशकता आणली आहे. एवढेच नव्हे तर देशात डिजिटल पेमेंटचा आधारही वाढला आहे. त्यात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बनवणे, ई-कॉमर्सचा विस्तार, लोकांमध्ये फोन वापरण्याचे प्रमाण वाढणे या प्रमुख घटना आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
विश्वगुरू बनण्याचा विश्वास
डिजिटलमुळे समाजातील प्रत्येक वर्गाच्या आकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सकारात्मकरित्या मदत केली जात आहे. मी लातूरसारख्या छोट्या शहरातून येतो. या शहरात डिजिटलचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्व अडचणींवर मात करता आली आहे. डिजिटल युगामुळे प्रत्येत व्यक्तीला राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याची संधी मिळाली आहे. तसेच आपण विश्व गुरू बनू शकतो, तेवढी आपली क्षमता आहे, हा विश्वास लोकांच्या मनातही निर्माण झाला आहे असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर, गतिशील नेतृत्व, नवविचाराचा ध्यास, उद्योजकता आणि मानवतेच्या विकासाचा ध्यास यामुळे भारत एक महासत्ता म्हणून भारताच्या स्थितीची पृष्टी करेल असा निष्कर्ष मी काढलेला आहे.