परभणी : आषाढी वारीसाठी आळंदी येथे गेलेल्या परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथील वारक-यांना इंद्रायणी नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. आळंदीत झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने दि.६ जुलै रोजी ठाकूरबुवा मठ परिसरात पुराचे पाणी शिरले.
या पुरात वारक-यांसाठी नेण्यात आलेले किराणा साहित्य, अन्नदानासाठी जमा केलेली रोख रकमेचे नुकसान झाले असून २ बोलेरो पिकअप गाड्या मागील ३६ तासांपासून पुरात अडकल्या आहेत. यामुळे वारक-यांचे मोठे नुकसान झाले असून या गाड्यांमध्ये कुणीही नसल्याने सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
पुणे शहरासह आळंदीत मुसळधार पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे आळंदीत इंद्रायणीच्या नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्यात सोपान अशोकराव सुक्रे (रा. वडगाव सुक्रे) यांची (एम.एच. ३८ ई २५९३) क्रमांकाची बोलेरो पिकअप, माऊली सूर्यभान कोपनर यांची बोलेरो पिकअप (एम.एच. ४४ यू ४४३९) अशा २ पार्कींग केलेल्या गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. त्यामुळे या गाड्यातील अन्नधान्य व पैशाचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे वारकरी आणि वाहन चालकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने ठाकुरबुवा मठ परिसरात अडकलेल्या वारक-यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम हाती घेतले आहे. पुरात अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली असून युध्दपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
आषाढी वारीसाठी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणलेले अन्नधान्य, किराणा साहित्य आणि अन्नदानासाठी जमा केलेली रक्कम पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वारक-यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे वारक-यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वारकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
















