नागपूर : प्रतिनिधी
देवदर्शन करून उत्तर प्रदेशातील वाराणसीहून नागपूरकडे परतणा-या नागपूरमधील एका कुटुंबातील काही महिलांचा दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान विनयभंग करण्यात आला. संतापजनक म्हणजे महिलांनी तक्रार करूनही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नसल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या घटनेने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबीयांसह वाराणसी येथून नागपूरकडे परतत होत्या. त्यांची बुकिंग असल्याने त्या रिझर्व्हेशन डब्यातून प्रवास करत होत्या. मात्र, गाडी सुटल्यानंतर डब्यात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षित डब्यात मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवासी शिरल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. महिलांच्या आरोपानुसार, गर्दीचा फायदा घेत काही प्रवाशांनी धक्काबुक्की केली, अश्लील शेरेबाजी केली तसेच विनयभंग केला.
या प्रकारामुळे महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे हेल्पलाईन १३९ वर संपर्क साधला. मात्र, तत्काळ आणि प्रभावी मदत मिळाली नसल्याचा दावा पीडित महिलांनी केला आहे. महिलांनी रेल्वे पोलिस तसेच स्थानिक पोलिसांकडेही तक्रार केल्याचे सांगितले आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून वेळेत कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही महिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपींची ओळख स्वत:च पटवून द्यावी, असे उत्तरही त्यांना देण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अखेर नैनी रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनासमोर जाऊन रेल रोको आंदोलन केले.
दरम्यान, प्रवासादरम्यान छेडछाडीचे प्रकार सुरूच राहिल्याचा महिलांचा आरोप असून या घटनेमुळे रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांचा प्रवेश रोखण्यासाठी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
















